हसन मुश्रीफ ,विश्वास नागरे -पाटील यांच्या विरोधात तक्रारी
कमलेश गायकवाड नवी दिल्ली ता १ —
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील हे राज्यातील घोटाळेबाजाना पाठीशी घालण्यासाठी मुंबई पोलिसांचा बेकायदेशीर वापर होऊ देत आहेत . मुंबई पोलीस मानवी हक्काचे उल्लंघन करत आहेत ,असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी आज येथे केला .
किरीट सोमैय्या यांनी आज केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा ,ग्रामीण विकास आणि पंचायत राजमंत्री गिरीराज सिंग तसेच केंद्रीय पंचायत राजराज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील मुद्यावर तक्रारी नोंदवल्या आहेत . किरीट सोमैय्या कोल्हापूरला निघाले असता त्यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी किमान ६ तास डांबून ठेवण्यात आले होते .
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन येथे देखील कांही वेळासाठी सोमैय्या यांना अडवून ठेवण्यात आले होते . हे मानवी हक्काचे उल्लंघन आहे असे सोमैय्या यांचे मत आहे . हे काम गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांच्या सांगण्यावरून मुंबई सहपोलीस आयुक्त विश्वास नागरे- पाटील यांनी केले . याची तक्रार सोमैय्या यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्याकडे आज केली . याची आता पुढील चौकशी होईल असे सोमैय्या म्हणाले .
महाराष्ट्रातील ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ हे आपल्या मंत्रालया अंतर्गत निधीचे वाटप /वितरण करत असतात .यात स्वतःच्या जावयाच्या कंपनीला बेकायदेशीर झुकते माप दिले जाते . यात आर्थिक गैरव्यवहार केला जातो . याची चौकशी व्हावी म्हणून ही तक्रार सोमैय्या यांनी गिरीराज सिंग आणि कपिल पाटील या दोन केंद्रीय मंत्र्याकडे केली . हसन मुश्रीफ यांच्या अधिपत्याखालील २ साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी गतीने सूर आहे असे सोमैय्या म्हणाले .
मी आज सक्तवसुली संचालनालय ( ई डी ) , प्राप्तिकर विभाग ( इन्कम टॅक्स ) अधिकाऱ्यांना भेटून माहिती दिली आणि तक्रार नोंदवली असे सोमैय्या यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटले .