जगभरात मायक्रोचिपच्या तुटवड्यामुळे वाहन तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक वाहन उत्पादकांना आपले उत्पादन कमी करावे लागले असून, कारखाने बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे मोठ्या मंदीची शक्यता निर्माण झाली आहे.


यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी यापूर्वी देखील अनेक व्यासपीठांवरुन लेख लिहून अथवा आपले म्हणणे मांडून याकडे गंभीर जागतिक विषयाकडे नुसते लक्षच वेधले नाही तर सरकार दरबारी याची किमान दखल तरी घेण्यात आली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला होता.
यानंतरच तातडीने भारत सरकारने काही पाऊले उचलत तैवान सरकारसोबत मायक्रोचिप उत्पादन सुविधा अर्थातच सेमीकंडक्टर फॅबचा प्लांट भारतात उभारण्याबाबतची चर्चा सुरु केली आहे व ही चर्चा प्रगतीपथावर आहे असे प्रसार माध्यमांतून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आज केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना मायक्रोचिपच्या कमतरतेची आठवण करून देत विनंतीवजा पत्र पाठवले आहे. यात सेमीकंडक्टर फॅबचे प्लांट नाशिकमध्ये उभारण्याची त्यांनी विनंती केली.
सेमीकंडक्टर फॅबकरिता नाशिक हे सर्वोत्तम ठिकाण आहे. मुबलक पाणी, कुशल मनुष्यबळ याच सोबत मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद या औद्योगिक पट्ट्याला असलेल्या सुलभ असल्यामुळे नाशिक हे सुयोग्य ठिकाण ठरते. तसेच नाशिक मध्ये वाहन आणि संलग्न उद्योगाचे जाळे उत्तम असल्याचे नमूद करत सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना नाशिक जिल्ह्याची निवड या प्लांटसाठी करावी असे या पत्रात सांगितले आहे.
नव्याने होत असलेला समृध्दी मार्ग, तसेच पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे ह्या सगळ्या प्रकल्पांमुळे नाशिकचं ह्या सेमीकंडक्टरच्या कारखान्यासाठी योग्य ठिकाण असल्याचे व त्या माध्यमातून नाशिक व उत्तर महाराष्ट्राला अपेक्षित रोजगार निर्मिती व प्रगती शक्य असल्याचेही सत्यजीत तांबे ह्यांनी सांगितले.
पियुष गोयल ह्यांना लिहिलेल्या पत्राची प्रत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री भारती पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी डॉ. पी. अनबलगन ह्यांनाही पाठवलेल्या आहेत.