मुंबई : गणपतीच्या आगमनाला फक्त काही तास शिल्लक आहेत. या दरम्यान मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav 2021 ) काळात गर्दी होऊ नये म्हणून मुंबईत कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान मुंबईत जमावबंदी असणार आहे. मुंबई पोलिसांकडून या संदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी सणासुदीच्या काळात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. गणोशोत्सव, नवरात्रोत्सवात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. कलम 144 नुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई पोलिसांनी एकूण 13 विशेष पथकं तयार केली आहेत. ज्यात 1 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 1 एपीआय, 2 पीएसआय असे 11 कॉन्स्टेबल असतील. मुंबईत एकूण 13 झोन आहेत आणि प्रत्येक झोनमध्ये एक पथक तैनात असेल. झोनमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की, नाही यावर हे पथक लक्ष ठेवेल. जर कोरोनाचे नियम कुठेही पाळले जात नसतील, तर स्थानिक पोलीस त्यावर कारवाई करत आहेत की नाही.
कोरोनाचे नियम कुठेही पाळले जात आहेत की नाही? आणि स्थानिक पोलीस त्यावर कारवाई करत आहेत की, नाहीत? यावर लक्ष ठेवते आणि जर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली नाही, तर या विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल तसेच स्थानिक पोलिसांनी जर कारवाई केली नाही तर या विशेष पथकाद्वारे देण्यात आलेल्या रिपोर्टनुसार स्थानिक पोलीस स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्यात येईल.