पुणे – लिलाव भिशीमध्ये गुंतवणूकच्या आमिषाने तिघांना तब्बल ५७ लाख ६० हजार रुपयांचा आर्थिक गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात शंकर लक्ष्मण गायकवाड ( रास्ता पेठ ) या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश किशोर प्रजापती ( वय-२९, रा. कोंढवा ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंकर गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड याचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. गायकवाड यांनी लिलाव भिशी सुरू केली होती. त्यामध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल अस अमिष दाखवून त्याने फिर्यादीला पैसे गुंतवायला सांगितले.
त्यानंतर गायकवाड यांच्या सांगण्यावरून प्रकाश प्रजापती यांच्याकडून वेळोवेळी ११ लाख ५४ हजार रुपये गुंतवले. इतकंच नाही तर १४ लाख ३० हजार रुपये हात उसने देखील दिले. मात्र प्रजापती यांना कुठलाही मोबदला देण्यात आला नाही.
गायकवाडने अशाच प्रकारे लिलाव भिशित गुंतवणुकीच्या आमिषाने राहुल दत्तात्रय वनारसे यांच्याकडून २५ लाख ५० हजार आशराणी रमेश नायकवडी यांच्याकडून १० लाख रुपये घेत फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
गायकवाड यांनी आमिष दाखवून तिघांना आर्थिक गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. अशा प्रकारे त्याने आणखीन काही जणांची फसवणूक केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गायकवाड हा सध्या पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. पुढील पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके पुढील तपास करत आहेत.