अंबरनाथ – अंबरनाथच्या मोरीवली गावातून शिर्डीला जायला निघालेल्या भाविकांच्या बसला सिन्नर शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १० जण मृत्युमुखी पडले असून यात मोरीवली गावातील बहुतांशी रहिवाशांचा समावेश आहे. त्यामुळे मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे.
अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी काल रात्री १५ बस करून शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते. यातील एका बसचा पहाटेच्या सुमारास नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. यात मृत्युमुखी पडलेले बहुतांशी भाविक हे अंबरनाथच्या मोरीवली गावातील रहिवासी आहेत. या अपघाताचं वृत्त समजताच मोरीवली गावातील रहिवासी अपघाताच्या ठिकाणी रवाना झाले. मोरीवली गावाच्या इतिहासातील इतकी भीषण अपघाताची ही पहिलीच घटना असून एकाच वेळी गावातील तब्बल १० जणांवर काळाने घाला घातल्यामुळे मोरीवली गावात शोकाकुल वातावरण पसरलं आहे.