सोलापूर – राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन गटात रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सोलापुरात जबर धक्का बसला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सोलापूर उपजिल्हाप्रमुख मनोज पवार (Manoj Pawar) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश करताना मनोज पवार यांनी शिंदे गटाच्या सोलापुरातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता.पुन्हा हे कार्यकर्ते व पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहेत.
मनसे,भाजपा ,काँग्रेस व शिंदे गटातील २१ जण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत
शिंदे गटाचे (बाळासाहेबांची शिवसेना) उपजिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी आज शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. शिंदे गटासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते असे एकूण २१ जणांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यासह शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांवर केले गंभीर आरोप
शिंदे गटातून ठाकरेंच्या शिवसेनेत सामील झालेल्या मनोज पवार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख हे एकदम निष्क्रिय माणूस आहेत. आपली पोळी शेकून घेण्यासाठी हे लोक शिंदे गटात गेले आहेत. या सर्वांचे दोन नंबरचे धंदे आहेत. ते सांभाळण्यासाठी तसेच सत्तेमुळे ते शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे गट हा दोन वर्ष देखील टिकणार नाही. यांची लवकरच माती होणार आहे, अशा शब्दांत पवार यांनी सोलापुरातील शिंदे गटावर घाणाघात केला.