सातारा – राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी छ. शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केलेली पत्राद्वारे तक्रार आणि किल्ले रायगडावर केलेले आक्रमक आंदोलन याची स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीच दखल घेतली आहे. राष्ट्रपती कार्यालयाने उदयनराजे भोसले यांना त्याबद्दलची माहिती कळवली आहे.
राज्यपाल यांनी केलेल्या शिवरायांवरील व्यक्तव्याबद्दल लक्ष घालण्याची विनंती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली होती. त्यासंबधी एक पत्रही राष्ट्रपती यांना पाठवलं होतं. उदयनराजे भोसले यांनी पाठवलेलं पत्र केंद्रीय गृह विभागाकडे पुढील कारवाई साठी पाठवले आहे. राष्ट्रपती कार्यालयाने उदयनराजे भोसले यांना त्याबद्दलची माहिती कळवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल यांनी केलेल्या आक्षेपार्ह व्यक्तव्यानंतर संतापलेल्या उदयनराजे यांनी २३ नोव्हेंबरला राष्ट्रपती यांना हे पत्र लिहलं होतं. आता या पत्राची दखल घेण्यात आली आहे.
त्यामुळे आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उचलबांगडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, राज्यपालांना पदावरून काढण्यासाठीची प्रक्रिया मला माहिती नाही परंतु पत्राची दखल घेतल्याची कॉपी आम्हाला आजच मिळाली आहे. राष्ट्रपतींनी पत्राची दखल घेतल्यामुळे उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींचे आभारही मानले आहेत.