उल्हासनगर – उल्हासनगरत एका २० वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या युवकाला उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आलंय.
आशिष उपाध्याय असं हल्ला झालेल्या जखमी युवकाचं नाव आहे. प्रेमप्रकरणातून त्याच्यावर हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आशिष याला आधी बिर्ला कॉलेज परिसरात धक्काबुक्की करण्यात आली, त्यानंतर उल्हासनगरच्या वाल्मिक नगरमध्ये त्याला ८ ते १० जणांनी गाठत जीवघेणी मारहाण केली. रस्त्यावर पडलेली लादी उचलून त्याच्या डोक्यात मारण्यात आली. त्याच्या पायावर शस्त्राने वार करण्यात आला. या हल्ल्यात आशिष हा जागीच कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला, असं समजून हल्लेखोर तिथून निघून गेले. यावेळी स्थानिकांनी आशिषला तातडीने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. मात्र आशिष याच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला उपचारांसाठी मुंबईला हलवलं. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.