मुंबई – अग्निशमन दलाच्या मुंबईतील सर्व भागातील हॉटेल रेस्टॉरंटमध्ये अचानक केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली आहे. जर आपण अधून मधून हॉटेल्स मध्ये जात असाल तर हॉटेल रेस्टॉरंट मधील आगेची घटना तुमच्या जीवावर बेतू शकते. कारण मुंबईतील तब्बल ९२ हाॅटेल रेस्टॉरंट मध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा बंद असल्याने अग्निशमन दलाने या हॉटेल्सला नोटीस बजावली आहे. पुढील १२० दिवसांत अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची अग्निशमन अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
प्रत्येक हाॅटेल रेस्टॉरंट मध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे हॉटेल मालकांना बंधनकारक आहे. हाॅटेल रेस्टॉरंट असो किंवा व्यवसायिक इमारती प्रत्येक ठिकाणी आग प्रतिबंधक उपाय योजना करणे संबंधित मालक व सोसायटी धारकांना बंधनकारक आहे. अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली की, नाही याची तपासणी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून अचानक पहाणी केली जाते. मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील ४४० हाॅटेल, रेस्टॉरंट मधील अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे की, नाही याची एकाच वेळी अचानक तीन आणि चार डिसेंबर दरम्यान संपूर्ण मुंबईभर तपासणी केली.
या तपासणीत तब्बल ९२ हाॅटेल रेस्टॉरंट मध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ९२ हाॅटेल रेस्टॉरंट मालकांना नोटीस बजावण्यात आली. तर दुसरीकडे मुंबईतील ८८ व्यावसायिक इमारतींची सुद्धा यामध्ये पाहणी करण्यात आली यामध्ये ४० व्यावसायिक इमारतींमध्ये सुद्धा अग्नि सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समोर आला आहे. त्यामुळे या ४० व्यावसायिक इमारतींना सुद्धा अग्निशमन दलाने नोटीस बजावली आहे.