सांगली – उच्च शिक्षण सोडून थेट राजकारणात एन्ट्री केलेल्या फॉरेन रिटर्न तरुणीने अखेर सरपंच पदाचा मुकुट मिळवला आहे. मिरज तालुक्यातल्या वड्डी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये यशोधरा राजे शिंदे हे तरुणी विजयी झाली आहे. इतकंचं नव्हे तर ग्रामपंचायती मध्ये तिचे संपूर्ण पॅनल देखील निवडून आले आहे.
सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एक लक्षवेधी निवडणूक ठरली, ती म्हणजे मिरज तालुक्यातल्या वड्डी गावची सरपंच पदाची, कारण एक तरुणी ही निवडणूक लढवण्यासाठी थेट परदेशातलं आपलं शिक्षण सोडून आपल्या गावी पोहचली होती. यशोधरा राजेश शिंदे, वय २१,असे या तरुणीचे नाव आहे. नरवाडच्या शिंदे घराण्यातील यशोधरा हिला लहानपणापासूनच राजकारणाचे धडे हिला थोड्याफार प्रमाणात मिळाले होते, पणजोबा नरवाड गावचे २५ वर्ष सरपंच, त्यानंतर त्यांच्या आजी मंदाकिनी राजे शिंदे गावच्या पाच वर्षे सरपंच होत्या, त्यानंतर वडील महेंद्रसिंग राजे शिंदे यांनी देखील ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे राजकीय वारसा होता.
वड्डी गावच्या ग्रामपंचायतची निवडणूक लागल्यानंतर सर्वसाधारण खुल्या गटामध्ये सरपंच पदी कुणाला उभा करायचा हा प्रश्न ? पॅनल उभे करताना शिंदे कुटुंबीयांसमोर निर्माण झाला होता, यातून यशोधराराजे शिंदे हिचे नाव समोर आले. यशोधरा ही त्यावेळी जॉर्जिया याठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत होती. घराच्यांनी मग यशोधरा हिला सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उभं राहायचं, असं सांगितलं सुरुवातीला तिला देखील थोडसं ही गोष्ट अवघड वाटली. मात्र घरच्यांचा आणि ग्रामस्थांचा असणारा आग्रह यामुळे यशोधरा राजे हिने सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निश्चय करत आपल्या शेवटच्या वर्षाच्या वैद्यकीय शिक्षण सोडून सरपंच निवडणूकीसाठी गावी परतली.
रेणुका देवी ग्रामविकास सरकार पॅनलच्या माध्यमातून गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी यशोधरा राजे हिने अर्ज दाखल करत निवडणुकीच्या प्रचार धडाक्यात सुरू केला, आणि सरपंच पदाच्या निवडणूकीत विजय देखील झाली. गावातील सत्तारूढ शिवस्वराज्य ग्राम विकास पॅनलच्या झाकीर वजीर यांचा १४९ मतांनी पराभव केला. या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये यशोधरा राजे हिला १३८४ तर झाकीर हुसेन १२३३ मते मिळाली.
या विजयानंतर बोलताना यशोधरा राजे शिंदे म्हणाली, आपल्या पॅनलवर देखील विश्वास ठेवला आहे आणि हा विश्वास सार्थ करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार आहोत, गावातल्या लहान मुलांच्या शाळा, आरोग्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे महिला सक्षमीकरण अश्या गोष्टींना प्राध्यान देणार असून प्रदेशात आपण ज्या गोष्टी पाहिल्यात त्या गावपातळीवरही राबवून गावाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपल्यासमोर एकमेव ध्येय आहेत. गावामध्ये छोटे-मोठे उद्योग उभारण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार असल्याचा या विजयानंतर यशोधरा राजे शिंदे हिने स्पष्ट केलं आहे. त्याच बरोबर आजच्या तरुण पिढीने राजकारणामध्ये येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, आणि मला वाटतं की, मी त्यांच्यासाठी नक्कीच आदर्श बनू शकेन, असं मतही तिने यावेळी व्यक्त केले आहे.