सिंधुदुर्ग – भाजप आमदार नितेश राणे हे अखेर कणकवली फौजदारी न्यायालयात शरण आले आहेत. तत्पुर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकार वर गंभीर आरोप केला आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणी अटकेची टांगती तलवार असणारे आम. नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात नियमित जामिनासाठी दाखल केलेला अर्ज काल न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर ते घरी निघाले असताना पोलिसांनी त्यांच्या गाड्या अडवल्या.
परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दहा दिवसांच्या दिलाशामुळे पोलिसांना नितेश राणे यांना अटक करता आले नाही. मात्र नितेश राणे यांनी आपल्या वकिलांची केलेल्या प्रदिर्घ सल्लामसलतीनंतर आज कणकवली दिवाणी न्यायालयात हजर होण्याचा निर्णय घेतला.
काही वेळापूर्वीच आमदार नितेश राणे हे संतोष परब हल्ल्याच्या गुन्ह्यात कणकवली न्यायालयात शरण गेले आहेत. न्यायालयात हजर झालेल्या आमदार नितेश राणे यांचा ताबा पोलीसांकडे देणार की नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येणार, याचा फैसला थोड्यावेळात होणार आहे.
आमदार नितेश राणे यांचा राज्य सरकारवर आरोप
दरम्यान कणकवली न्यायालयात हजर होण्यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर आरोप केला. सरकार मला बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र जिल्हा न्यायालयाचा धडकून न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत मी कणकवली न्यायालयात हजर होत आहे असे ते यावेळी म्हणाले.