कोंकण महाराष्ट्र

नमणारही नाही, घाबरणारही नाही; आता सरपंचाला आली एसीबीची नोटीस, आमदार नाईक भडकले

सिंधुदुर्ग – सिधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कुडाळ तालुक्यातील कुंदे ग्रामपंचायतीच्या सरपंचांना चौकशी साठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान, आपल्यावर दबाव आणण्यासाठी आपल्या निधीतून विकास कामे ज्या ज्या लोकांनी केली आहेत त्यांना नोटिसा काढून हा नवा प्रयत्न केला जात असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे. तब्बल २०० जणांना अशा नोटिसा गेल्या असून या चौकशीला आणि घाबरत नाही असेही नाईक म्हणाले.

शिवसेना ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार वैभव नाईक यांची एसीबीमार्फत चौकशी सुरू आहे. आता त्यांच्या आमदार निधीतून ज्या ज्या गावात विकास कामे झालीत त्याचीही चौकशी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून एसीबीने आता कुडाळ तालुक्यातील कुंदे ग्रामपंचायतीच्या सरपंचांना नोटीस बजावली आहे.

या नोटीशीत असे म्हटले आहे की, उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून उघड चौकशी कमांक ०१/२०२२ अन्वये वैभव विजय नाईक, (आमदार २६९ कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ) यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरु आहे.

आपण कुंदे मुख्य रस्ता ते आंबेडकरनगर आणि आंबेडकरनगर ते भटवाडी रस्त्यावर कॉजवे बांधणे हे काम आमदार वैभव विजय नाईक यांच्या आमदार फंडातून केलेले आहे. त्याअनुषंगाने आपल्याकडे चौकशी करुन, आपला जबाब नोंद करणे आवश्यक आहे. तरी सदर कामाची आपणांस मिळालेली वर्क ऑर्डर, काम पूर्ण झाल्यानंतर संबधीत विभागाकडून आपणांस कामाची मिळालेली मोबदला रक्कम, ज्या बँकेच्या बॅक खात्याव्दारे प्राप्त झाली त्या खाते उताऱ्यांसह आपले आधारकार्ड/पॅनकार्ड तसेच वरील कामासंबंधीत इतर आवश्यक त्या कागदपत्रांसह आपण आमच्या समक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय मारुतीमंदिर, नाचणेरोड रत्नागिरी येथे उपस्थित राहावे, असे या नोटीशीत म्हटले आहे.

कुंदे ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह जिल्ह्यात तब्बल २०० लोकांना एसीबीच्या नोटिसा गेल्या आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या विकास निधीतून ज्या ज्या लोकांनी कामे केलीत अशा लोकांना या नोटिसा काढण्यात आल्या आहेत.

आपल्यावर दबाव आणण्याचा हा नवा प्रयत्न- आमदार वैभव नाईक
दरम्यान, आपल्यावर दबाव आणण्यासाठी हा नवा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. असा कितीही दबाव आणला तरी आपण नमणार नाही आणि घाबरणार देखील नाही असेही आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment