कोंकण महाराष्ट्र

‘रत्नसागर’ बोट बुडाली, दोघांचा मृत्यू एक बेपत्ता

रत्नागिरी – गुजरातच्या बोटीला रत्नागिरी जवळ जलसमाधी दोन खलाशांचा मृत्यू तर एक बेपत्ता झाला आहे. ‘रत्नसागर’असे बोटीचे नाव जयगड पासून ८० नॉटिकल माईल परिसरातली घटना घडली. कोस्ट गार्ड करून युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू होते. हेलिकॉप्टर आणि बोटीच्या सहाय्यानं चार जणांना वाचवलं बोटीतील वाचलेल्या खलाशांनी हा सगळा थरारक प्रसंग सांगितला आहे. यात तिघे खलाशी बुडाले असून दोघे सख्खे भाऊ होते. दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. अन्य एक खलाशी मात्र अद्याप बेपत्ता आहे. ही दुर्दैवी घटना रत्नागिरीपासून ९५ वाव समुद्रात घडली. बुडालेली नौका तलासरी येथील असून बुधवारी दुपारी मृतदेहांसह बचावलेल्या चौघांना घेऊन तीन नौका तटरक्षक दलाच्या पथकासह रत्नागिरीतील मिरकरवाडा दाखल झाल्या. बेपत्ता असलेल्या एका खलाशाचा तटरक्षक दलाकडून शोध सुरु ठेवण्यात आला आहे.

गुजरात तलासरी येथील रत्नसागर, गधाधर, कुणकेश्वरी २, कपीध्वज या चार नौका ९५ वाव समुद्रात मासेमारी करीत होत्या. मंगलोरहून त्या पुन्हा तलासरीच्या दिशेने जात असताना, रत्नागिरीपासून खोल समुद्रातील वातावरण खवळलेले होते. त्यामुळे त्यां नौकांनी नांगर टाकला होता. यातील ‘रत्नसागर’ नौकेतील खलाशीही रात्री ८ वाजल्यानंतर जेवून खवळलेला समुद्र शांत होण्याची वाट पाहत बसले होते. त्याचवेळी मध्यरात्री लाटांच्या मार्‍यामुळे नौकेच्या मध्यभागातील फळीचा एक खिळा निखळला आणि नौकेला भगदाड पडले. त्यामुळे पाणी नौकेच्या आत घुसले. खलाशांना काही समजण्यापूर्वीच नौका कलंडू लागली. त्यावेळी नौकेच्या डेकवर बसलेल्या खलाशांनी ओरडून केबीनमधील तांडेल व अन्य खलाशांना जागे करण्याचा प्रयत्न केला.

परंतु सर्वजण नौकेच्या बाहेर पडण्यापूर्वीच नौका पाण्यात उलटी झाली. यावेळी डेकवरील कल्पेश लहाने भंडार (३०, तलासरी), दीपक भिखार वळवी (३८,तलासरी), अंतोल देवल्या भगत (३२, ) , जयवंत जंत्र्या खरपडे (५०, तलासरी), हे पाण्यात फेकले गेले. त्यांनी नौकेवरील दोर पकडून काही काळ पाण्यात लटकत राहिले. त्यानंतर उलट्या झालेल्या नौकेवर चढून आपला जीव वाचवला. यावेळी त्यांनी जवळच असलेल्या नौकांना ओरडून बचावासाठी प्रयत्न केला. अपघातग्रस्त नौकेपासून जवळ असणार्‍या ‘गदाधर’ या नौकेतील खलाशांनी या बुडालेल्या नौकेवरील चौघांनाही आपल्या नौकेवर घेतले. हा प्रकार पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडला.

यानंतर ‘गदाधर’ नौकेवरील खलाशांनी अपघाताची माहिती आपल्या मालकांना दिली. त्यानंतर अपघाताची घटना तटरक्षक दलाच्या मुंबईतील नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर रत्नागिरीला कळवण्यात आले. रत्नागिरी व जयगड बंदरात असणार्‍या नौकांना त्यानंतर लागलीच घटनास्थळाकडे कुच केली. सकाळी हेलिकॉप्टरही मदतीसाठी व शोध घेण्यासाठी रवाना झाले.

अपघातग्रस्त ‘रत्नसागर’ मधील लक्ष्मण भिखार वळवी (४२) व सुरेश भिखार वळवी (४५) दोघेही रा. तलासरी या दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह सकाळी दिसून आल्यावर अन्य नौकांमधील खलाशांनी त्यांना बाहेर काढले. यातील मधुकर चैत्या खटल (४५, तलासरी) हा खलाशी बेपत्ता आहे. घटना घडली त्यावेळी मधुकर हा केबीनच्या खाली असणार्‍या जागेमध्ये झोपला होता. त्यामुळे त्याला बाहेर पडता आले नसावे अशी शक्यता बचावलेल्या खलाशांनी व्यक्त केली. तटरक्षक दलाच्या पथकाने बचावलेल्या चौघांसह तलासरी येथील तीनही नौका व दोन मृतदेह घेऊन दुपारी३ वा. मिरकरवाडा बंदर गाठले. त्यानंतर मृतदेह व बचावलेल्या चौघांनाही रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी तटरक्षक दलाचे अधिकारी, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी जीवन सावंत व तृप्ती पवार व अन्य कर्मचार्‍यांसह पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. मिरकरवाडा बंदरात अपघातग्रस्त नौकेचे मालक व तलासरी येथील नागरिक दाखल झाले होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment