पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वाची घोषणा केली असून फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत
Partition Horrors Remembrance Day: रविवारी संपूर्ण देशभरात भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्वाची घोषणा केली असून फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ (विभाजन विभीषिका स्मृति दिवस) म्हणून ओळखला जाईल असं सांगितलं आहे.
नरेंद्र मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू-भगिनींना स्थलांतरित व्हावं लागलं आणि काहींना तर आपला जीवही गमवावा लागला. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाची आठवण ठेवत १४ ऑगस्टला ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे”.
“हा दिवस आपल्याला भेदभाव, शत्रूत्व आणि द्वेष संपवण्यासाठी फक्त प्रेरणा देणार नाही; तर यामुळे एकता, सामाजिक सद्भावना आणि भावना मजबूत होतील,” असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
१४ ऑगस्ट १९४७ रोजी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती. पाकिस्तानात १४ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो.