पश्चिम महाराष्ट्र

प्रियकराच्या मदतीने आईनेच आपल्या दोन्ही लेकरांना चोरले होते

सोलापूर – मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या दोन्ही लेकरांची चोरी केली होते. दोन्ही लेकरं अचानकपणे बेपत्ता झाल्याने वडील प्रकाश अण्णाप्पा कोळी यांनी मंद्रुप पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आईसह प्रियकराला ताब्यात घेतले. प्रियकराच्या मदतीने आपल्या दोन्ही बाळांना पळवले असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली. दोन्ही मुलांसह आई सांगली येथे होती. सांगली पोलिसांच्या मदतीने व मंद्रुप पोलिसांच्या सतर्कतेने दोन्ही मुलं सुखरूप मिळाली. मंद्रुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही लेकरांना बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

दोन्ही लेकरं अचानकपणे बेपत्ता झाली असल्याची फिर्याद दाखल झाली होती
२८ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास प्रकाश अण्णाप्पा कोळी (वय वर्षे ४९,रा. औज मंद्रूप,तालुका दक्षिण सोलापुर ) यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार २७ जानेवारी रोजी रात्री ८;३० वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी मधुरा (वय वर्षे १०) व मुलगा गौरीशंकर उर्फ पार्थ (वय वर्षे ८) हे दोघे फिर्यादीला डबा देण्यासाठी घरातून गेले ते परतलेच नाहीत. २८ जानेवारी रोजी दिवसभर त्यांचा गावात,नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु ती न मिळून आल्याने मंद्रुप पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुलांना पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

सुरुवातीला पोलिसांनी दोन्ही लेकरं सुखरूप असल्याची खात्री केली
गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच सदर गुन्ह्याचा तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे सपोनि रवींद्र मांजरे यांनी स्वतःकडे घेऊन तात्काळ सदर मुलांच्या शोधाकरिता दोन पथके रवाना केली. एपीआय रवींद्र मांजरे यांनी तात्काळ औज गावात भेट देऊन गोपनीय व परिस्थितीची माहिती घेतली. मंद्रुप पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी संदीप काळे व दिनेश पवार यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदरची दोन्ही मुले ही त्यांच्या आईनेच लक्ष्मी प्रकाश कोळी हिने रात्री येऊन मुलांना घेऊन गेली आहे.सपोनि मांजरे,उपअधीक्षक अमोल भारती यांनी फोन वरून सदर मुलीच्या आईसोबत बोलणी करून मुले सुरक्षित असल्याची खात्री केली.

सांगली पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले
सदर मुलांना ताब्यात घेण्यासाठी तात्काळ आईच्या मोबाईलच्या लोकेशनवर पीएसआय अमितकुमार करपे व पथक सांगली येथे रवाना झाले. पोलिसांनी सांगली येथील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना संपर्क करून आईच्या लोकेशनवर पोलीस पथक पाठविण्याची मागणी केली. सदर लोकेशनवर सांगली पोलीस कडील पोलीस हवालदार वाघमोडे व पथक यांनी जाऊन मंद्रुप पोलिसांनी पुरवलेल्या माहितीप्रमाणे त्यांना ताब्यात घेतले.

मुलांच्या आईला नोटीस देऊन सोडले तर प्रियकराची न्यायालयीन कोठडी रवाना
ह्या गुन्ह्यात मुलांच्या आईला मुले पळवून घेऊन जाण्यात मदत करणारा व्यक्ती शिवराज सुभाष भतगुणगी व आई लक्ष्मीला आरोपी करण्यात आले. आईला नोटीस देऊन सोडुन देण्यात आले आहे. आईला मदत करणाऱ्या तिच्या प्रियकर इसमास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लक्ष्मी ही गेल्या सहा महिन्यांपासून प्रियकरा सोबत सांगली येथे राहत होती. मुलांची खूप आठवण येत असल्याने असे कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांना दिली. दोन्ही मुलं शोधून सुखरूप परत आणण्याची कामगिरी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सपोनि रवींद्र मांजरे,पीएसआय अमितकुमार करपे,पोलीस हवालदार अंगद गिते,राहुल महिंद्रकर,प्रमोद असादे,मोहन मनसावले,पोलीस नाईक अविनाश पाटील,पोलीस अंमलदार संदीप काळे,दिनेश पवार,सागर चव्हाण,संजय कांबळे,महिला पोलीस शिपाई दिक्षिता दोडतले,चालक हनुमंत जाधव यांनी केली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment